शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. यावर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कराची स्वीट्सच्या वादावरुन शिवसेनेच्या भूमिकेला टोलवताना उलट कराचीच एक दिवस भारताचा भाग असेल असं त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीस म्हणाले, “आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल.”

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली नुकतीच केली होती. कराची पाकिस्तानातील शहर आहे त्यामुळे या शहराच्या नावानं भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

दरम्यान, “मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.