औरंगाबादमधील शहरातील सिद्धार्थ उद्याानातील सहा वर्षे वयाच्या पट्टेदार ‘करिना’ वाघिणीचा आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी अखेर मृत्यू झाला.  मृत्यूपूर्वी वाघिणीची करोना चाचणीसाठी नमूने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप यायच आहे.

शिवाय, दोन दिवसांपासून या आजारी वाघिणीच्या रक्ताची देखील तपासणी करण्यात येत होती. मूत्रपिंडाच्या विकारामुळे वाघिणीचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक निदान असून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून तसेच प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून शवविच्छेदन करायचे की नाही, याचे मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली  आहे. दरम्यान, अन्य वाघांचीही तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील प्राणी संग्रहालयात पाच मादी आणि चार नर वाघ आहेत. त्यातील ‘करिना’ वाघिणीने दोन दिवसापूर्वी खाणे- पिणे सोडून दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली होती. महापालिका आयुक्तांनाही प्राणीसंग्रहालयास मंगळवारी भेट दिली होती. त्यानंतर  वाघिणीचे  रक्त आणि लघवीचे नमूने घेण्यात आले होते. तसेच करोना चाचणीही करण्यात आली होती. दरम्यान सकाळी वाघिणीने पाणी पिले नंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

करिना वाघिणीच्या मृत्यूनंतर आता प्राणिसंग्रहालयातील  अन्य वाघांची तपासणी आता केली जात आहे. मात्र, करोना काळ असल्याने वैद्याकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालयाकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त पांडेय म्हणाले आहेत.

देशभरातच करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना करोना होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आधीच जारी केलेले आहेत.