सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव रविवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट यामुळे दूर झाले आहे. कास परिसरात महिनाभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. गुरुवारपासून कास परिसरात सतत पावसाची रिमझीम सुरु होती. शनिवारी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने शनिवारी मध्यरात्री कास तलाव भरून पाणी सांडव्यावरून वाहू लागले. यामुळे सातारकरांना आता वर्षभरासाठी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. सातारा शहराचा वाढता पसारा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांची पाण्याची गरज भागावी यासाठी कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरु करण्यात आले असून साठ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानतंर सध्याच्या पाणी साठ्याच्या तिप्पट साठा या धरणात उपलब्ध होणार आहे.