काँग्रेस सरकारचा राजा बेफिकीर व जनता हवालदिल झाल्याची टीका भाजप आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केला. गेली २५ वर्षे सत्तास्थाने भोगणाऱ्या नारायण राणे यांनी जनतेला कधी टॉनिकच दिले नाही, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आमदार आ. प्रमोद जठार यांनी नारायण राणे व काँग्रेसवर टीका केली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला एका हाताने अधिस्थगन आदेशाची भेट देणारे दुसऱ्या हाताने मोर्चे काढणारी नौटंकी करीत आहेत, अशी टीका करताना आ. प्रमोद जठार म्हणाले, जनता भूलथापांना भुलणार नाही. राज्यकर्ते नोकर व जनता मालक असताना गेली २५ वर्षे मी म्हणणाऱ्यांनी जनतेला टॉनिक दिले नाही उलट हे टॉनिक घरातच नेले, असे आ. प्रमोद जठार म्हणाले. जनता मालक व लोकप्रतिनिधी नोकर आहे, अशी भावना अपेक्षित असताना जनतेला गृहीत धरून २५ वर्षे सिंधुदुर्गवासीयांनी मीपणामुळे विकासाचे नुकसान केले, असे आ. प्रमोद जठार यांनी सांगत वनसंज्ञा, गौण खनिजबंदी, वृक्षतोडबंदी सारे पाप कोणाचे आहे हे जनता ओळखत असल्याने जनतेला सदा काळ फसविता येणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. सिंधुदुर्गची जनता या मंडळींना एकदाच जागा दाखवेल. मग हे पुन्हा ऊठू शकणार नाहीत. या जनतेचा आत्मविश्वास निवडणुकांत दिसेलच, असे आ. प्रमोद जठार म्हणाले.