पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी,कुंभी, कासारी, तुळशी, वारणा व दूधगंगा धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून पंचगंगा नदी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. दरम्यान,गगणबावडा या ठिकाणी भुईबावडा घाटात दरड कोसळली आसल्याने वहातुक बंद करण्यात आली आहे.

राधानगरी परिसरात पुन्हा एकदा पावसाचा जोर  वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून ७११२ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. कुंभीमधून १८००, कासारीमधून १८००, तुळशीमधून १११०, वारणामधून ८३०५ व दूधगंगा धरणातून ८८०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. सध्या राजाराम बंधार्याची पाणी पातळी २४ फूट ०३ इंच इतकी असून रात्रीतून ६ इंच वाढण्याची शक्यता आहे. कोयना धरणातूनही १ लाख क्युसेक विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चिकोत्रा धरण
चिकोत्रा धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे वीजगृहातून सकाळपासून १०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दूधगंगा धरणातून सांडव्यावरून 10200 क्यूसेक आणि विद्युत गृहातून 1800 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे