कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील नद्यांची धोका पातळीवरून वाढण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात नद्यांना आलेला पूर पाहून पूरग्रस्त भागातील लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन केले जात आहे. यासाठी कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी भर पावसात पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सर्व नद्यांना पूर आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने 39 फूट ही इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे जात आहे. पाणलोट क्षेत्रात, जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने धोका पातळी गाठण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाने वर्तवलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफच्या दोन पथकांना कोल्हापुरात पाचारण केले आहे. त्यांच्याकरवी पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. LIVE Updates: महाराष्ट्रातील पावसाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर दरम्यान शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक भागांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. कोल्हापूर शहराच्या ही अनेक भागात पाणी नसल्याने नागरिकांची दैना झाली आहे. पुराचा धोका वाढू नये यासाठी या लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे असे प्रयत्न सुरू आहेत. आज भर पावसामध्ये आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. पावसाचे पाणी वाढत आहे त्यामुळे तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे,असे आवाहन ऋतुराज पाटील यांनी केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कालपासून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरसह काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील रामानंद नगर परिसरामध्ये ओढ्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. आज सकाळपासूनच या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. परंतु, खूप विनंती करूनदेखील अजूनही काही नागरिक घराबाहेर पडत नाहीत. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, अजून दोन दिवस पाऊस आहे, त्यामुळे पाणी वाढण्याची वाट न पाहता प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.