करोना निवारणार्थ नियमापेक्षा जादा होमिओपॅथिक गोळ्या दिल्या नसल्याच्या रागातून खाटांगळे येथे आशा कर्मचारीस सोमवारी मारहाण करण्यात आली. याबद्दल ग्रामपंचायत सदस्यांसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, मारहाण करणार्यांना अटक होत नाही तोपर्यंत करवीर तालुक्यातील सर्व 'आशा' कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. खाटांगळे (ता. करवीर) येथील शोभा अशोक तळेकर (वय ४२) ह्या सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सात जून रोजी गावामध्ये करोना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे पात्र व्यक्ती लाभार्थींना यादीनुसार वाटप करत होत्या. ग्रामपंचायत सदस्या वैशाली कृष्णात पाटील यांनी त्यांना ज्यादा गोळ्यांची मागणी केली. तळेकर यांनी नियमावली सांगून अधिकची औषधी देता येत नाहीत, असे स्पष्ट केले. या रागातून वैशाली पाटील यांच्यासह कृष्णात बापू पाटील ,एकनाथ बापू पाटील, पंडित बापू पाटील या चौघांनी तळेकर यांना मारहाण केली, असल्याची तक्रार तळेकर यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. परंतु एकाच व्यक्तीवर कारवाई केल्याने या घटनेचा निषेध करून तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी बेमूदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने दोषींवर ताबडतोब कारवाई न केल्यास जिल्ह्यातील आशा कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.