राज्यभरात गाजलेल्या कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात रक्तगट हा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. पीडित मुलीच्या रक्ताचे डाग नराधमाच्या कपड्यांवर होते. याच पुराव्यामुळे नराधमांना दोषी ठरवता आले, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्व निकम यांनी 'लोकसत्ता ऑनलाईन'ला दिली. कोपर्डी प्रकरणातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिन्ही नराधमांना न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवले. न्यायालयाच्या निकालानंतर विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांनी 'लोकसत्ता ऑनलाईन'ला दुरध्वनीवरुन प्रतिक्रिया दिली. निकम म्हणाले, या खटल्यात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुरावे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पीडित मुलीचा रक्तगट 'अ' होता. तर जितेंद्र शिंदेचा रक्तगट 'ओ' होता. पीडित मुलीच्या रक्ताचे डाग आरोपीच्या कपड्यांवर होते. रक्ताचे नमुने तपासले असता जितेंद्र शिंदेच्या कपड्यांवर पीडित मुलीच्या रक्ताचे डाग असल्याचे स्पष्ट झाले आणि न्यायालयासमोर हाच पुरावा महत्त्वाचा ठरला, असे त्यांनी सांगितले. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित मुलीची छेड काढली होती. पीडित मुलीवर बलात्कार करण्याची धमकी त्यांनी दिली होती, या घटनेचे साक्षीदार होते आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध केले, असे निकम यांनी सांगितले. न्यायालयाने तिन्ही नराधमांना ८ कलमांखाली दोषी ठरवले आहे. ज्या कलमांखाली त्यांना दोषी ठरवली त्यानुसार तिघांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. कोपर्डी प्रकरण अन्य घटनांपेक्षा माझ्यासाठी जास्त आव्हानत्मक होते. कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मोर्चे निघत होते. दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून मुख्यमंत्री, सरकारी वकील यांची साक्ष घेण्याची मागणी करत वेळकाढूपणा करण्याता आला. मात्र आम्ही आरोपींना दोषी ठरवण्यात यशस्वी ठरलो, असे निकम यांनी नमूद केले.