कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे हजर झालेल्या वढू बुद्रुक गावाच्या सरपंच रेखा शिवाळे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या दफ्तरामध्ये वादग्रस्त अशा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या समाधीविषयी कुठलीही नोंद नसून तिथलं बांधकाम गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये करण्यात आलेलं आहे. शिवाळे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीच्या दफ्तरामध्ये गावातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, कवी कलश, शिवाची समाधी, देशमुख उर्फ बापू बुवा आणि पद्मावती व जुनी मंदिरे यांचा समावेश आहे.” ग्रामपंचायतीमधील कुठल्याही नोंदींमध्ये गोविंद गोपाल यांच्या समाधीचा उल्लेख नसल्याचे शिवाळे यांनी सांगितले.

प्रल्हाद ईश्वर गायकवाड या वढू बुद्रुकमधल्या दलित समाजातील व्यक्तीने दिलेली कादगपत्रं शिवाळे यांनी सादर केली. गोविंद गोपाळ यांच्या समाधीच्या जागेचे वारस ते असल्याचे यात म्हटले आहे. यामध्ये हातानं लिहिलेला अर्ज व प्रल्हाद गायकवाड यांचे २०१८ मध्ये नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आहे. ही जागा त्यांच्या मालकीची आहे व ती कशासाठीही देऊ नये असा हा अर्ज होता. प्रल्हाद गायकवाड यांच्या मालकिच्या जागेवर घर होते जे १९९७च्या भीमा नदीच्या पूरात वाहून गेले असे नमूद करण्यात आले आहे.

अर्थात, आता प्रल्हाद गायकवाड यांनी आता चौकशी समितीपुढे वेगळे प्रतिज्ञापत्र सादर केले असून ग्रामपंचायतीकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अस्वीकार केला आहे. गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधी तीन वर्षापूर्वी अस्तित्वात आली असं आपलं मत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, ग्रामपंचायतीपुढे मी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा स्वीकार करू नये असंही गायकवाड यांनी चौकशी समितीला सांगितलं आहे. तर, दबावामुळे गायकवाड हे प्रतिज्ञापत्र नाकारत असल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहे.

औरंगजेबानं १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्यानंतर वढू बुद्रुक येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. मराठा समाजाचं म्हणणं आहे की ही समाधी त्यांचे पुर्वज असलेल्या व महाराजांवर अंतिम संस्कार केलेल्या शिवाळे देशमुखांनी बांधली. तर, दलितांचं म्हणणं आहे की, महार समाजाच्या गोविंद गोपाळ यांनी संभाजी महाराजांवर अंत्य संस्कार केले. गोविंद गोपाळ यांच्या इतिहासाविषयी मजकूर असलेला वादग्रस्त फलक गावामध्ये २८ डिसेंबर २०१७ रोजी लावण्यात आला. जो मराठा समाजातील लोकांनी काढून टाकला. यावेळी गोविंद गोपाळांच्या समाधीच्या छपराची नासधूस झाली. यानंतर मराठा समाजातील ४९ जणांविरोधात तक्रार करण्यात आली. तर दलितांविरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या.

या सगळ्या घटना कोरेगाव भीमा लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १ जानेवारीपूर्वी, दलित काही किलोमीटरवर असलेल्या जयस्तंभाला भेट देणार होते या पार्श्वभूमीवर घडल्या. कोरेगाव भीमामधल्या हिंसक घटनांना वढू बुद्रुकमधल्या घटना कारणीभूत ठरल्याचे मानण्यात येत आहे. दलित व मराठा एकमेकांविरोधात उभे राहिले व मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आता, मूळात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कुणी केले, गोविंद गोपाळ यांची समाधी नक्की कधी बांधण्यात आली आदी बाबींवर खल सुरू आहे.