कोर्लई येथील जमीन खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई इथं खरेदी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली. सात दिवसांत गुन्हा न दाखल झाल्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केलेली आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि वायकर कुटुंबियांवर गंभीर आरोप करत जमीन खरेदी प्रकरणी आज (३ मार्च) रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा- संजय राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्या खिशात?

कोर्लई जमीन खरेदी प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. अलिबागच्या डीवायएसपी सोनाली कदम यांची भेट घेऊन तक्रारींचा ४०२ पानी दस्तऐवज सोमय्यांनी सादर केला. यात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पुरावे दिल्याचे सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या तक्रारीची पुढील ७ दिवसात दखल घेऊन गुन्हा दाखल झाला नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार करू, असा सोमय्या यांनी दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते उपस्थित होते.