सततच्या दमदार पावसामुळे चालू हंगामाच्या ४१ दिवसांतच पश्चिम महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प दोन तृतीयांशहून अधिक भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. महाकाय कोयना जलाशयात ४१ दिवसांत सुमारे ५३ टीएमसी पाण्याची समाधानकारक आवक होऊन पाणीसाठा ७९.६४ टीएमसी म्हणजेच जवळपास ७५.६७ टक्के असताना, आज दुपारी पावणेएक वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून कोयना नदीतपात्रात ७, ४४१ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर, पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक्स पाणी कोयना नदीत मिसळत आहे. कोयना धरणाची पाणीपातळी १ ऑगस्टपर्यंत २,१४० फुट नियंत्रित करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले. 
सध्या धरणात २२,८५७ क्युसेक्स पाणी मिसळत असून, धरणाचे सहा वक्र दरवाजे व पायथा वीजगृहातून कोयना नदीत ९,५५२ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात सरासरी २,७४९.२५ मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी हाच पाऊस १,१४६.६६ मि. मी. राहताना कोयना धरणाचा पाणीसाठा ३३.९८ टीएमसी म्हणजेच ३२.२८ टक्के होता. धरण क्षमतेने भरण्यासाठी ७३ टीएमसी पाण्याची गरज होती. सध्या धरण क्षमतेने भरण्यासाठी केवळ साडेपंचवीस टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठीही समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरी कराड तालुक्यात २३३.८२ तर, पाटण तालुक्यात ८५१.५८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कराड तालुक्यात १२२ तर, पाटण तालुक्यात ४३९ मि.मी. पावसाची नोंद होती. कोयना धरणक्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी गतवर्षीच्या तुलनेत सव्वा दोनपटीने जादा पाऊस झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा पुढील प्रमाणे
पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी
कोयना जलसागर ८०.३० (७६.३०) वारणा २६.७५ (७७.७८), दुधगंगा १६.८२ (६६), राधानगरी ६.४२ (७७),धोम ७.५३ (५५.८३), कण्हेर ६.६१ (६५.४४), उरमोडी ६.७८(६९.७५), तारळी ५.०२ (८५), धोम बलकवडी २.४४ (५८.६३), कुंभी कासारी २.०२ (७३) पुणे जिल्ह्यातील वीर ४.४६ (४७.३६) नीरा देवघर ७ (५९.७३), भाटघर १४.७४ (६३.६३), पाटगाव २.५९ (७०.०७), खडकवासला ०.९१ (४६.३२), पानशेत ७.१० (६६.६४), वरसगाव ६.५७ (६१.२१), टेमघर १.७० (४५.७८), पवना ५.७५(६७.५५), साचकमान ५.३३(७०.४३).