नाशिकमध्ये सुरु असलेल्या लष्कर भरतीसाठी आलेल्या तरुणांवर कडाक्याच्या थंडीत पहाटेच्या सुमारास लष्कराकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मुक्कामाला थांबलेल्या तरुणांमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत गोंधळ झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून या लाठीमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

रविवारपासून येथे भरतीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी शनिवारी रात्रीच कडाक्याची थंडी असतानाही हजारो तरुण येथील लष्कराच्या देवळाली कँप परिसरात भरतीच्या ठिकाणी दाखल झाले होते. थंडीची शक्यता लक्षात घेता देशसेवेचे स्वप्न घेऊन आलेल्या या तरुणांसाठी आवश्यक अशा कोणत्याही सोयी-सुविधा पुरवण्या आल्या नव्हत्या. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

लष्कराच्या ६८ जागांच्या भरतीसाठी १२०० तरुण शनिवारी रात्रीपासूनच या ठिकाणी दाखल झाले होते. रात्रभर हे तरुण या भागात मुक्कामाला होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहाटे भरतीला सुरुवात होण्यापूर्वी तरुणांच्या गर्दीत गोंधळ उडाला त्यामुळे लष्करी जवानांनी येथे सौम्य लाठीमार केला. त्यामुळे हे तरुण सैरावैरा पळत होते, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या पळापळीत अनेकांची कागदपत्रे गहाळ झाल्याचे कळते. त्यामुळे नक्की कशामुळे हा गोंधळ झाला आणि या कारवाईचे पुढे काय होणार हे पहावे लागेल.