राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्वाळा

सांगली : राज्यातील महाविकास आघाडी तुटावी अशी भावना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामागे नसावी असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.

सांगलीमध्ये जयंत बचाव पथकाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सांगलीवाडी येथील घाटावर झाले. यावेळी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले, आमदार सरनाईक यांच्या पत्राबाबत मला अद्याप काही माहिती मिळालेली नाही. तरीही हे पत्र म्हणजे, महाविकास आघाडी तुटावी अशी भावना यामागे असावी  असे मला वाटत नाही. या पत्रामुळे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात वितुष्ट येईल असेही मला वाटत नाही. आ. सरनाईक हे आघाडी टिकावी या मताचे आहेत.

अनेक वेळा त्यांनी खासगीमध्ये बोलताना आघाडीचे समर्थन केले आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये सेना आणि राष्ट्रवादीमध्ये काय वाद झाला आहे का हे पाहावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसकडून सातत्याने स्वबळाची भाषा बोलली जात आहे. काँग्रेसचे नेते पुढील मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल असे सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले, प्रत्येकाला पक्ष विस्तार करण्याचा हक्क आहे. मात्र महाविकास आघाडी एका विचारावर एकत्र आली असून हाच विचार घेऊन सध्या सरकार कार्यरत आहे. तरीही काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह कायम राहणार असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र राहतील.