यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असून यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या वक्तव्यातून गडकरींनी मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो ‘फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही’, असे कारण देतो. पण माझे म्हणणं आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. या विधानातून गडकरींनी मोदींनाच अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहीले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे गडकरींनी सांगितले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थावर कारवाई केली जाते. तर भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेस च्या संस्थवर कारवाई केली जाते.हे थांबवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते.

तीन राज्यांमधील पराभवानंतर २०१९ मध्ये भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरीच योग्य उमेदवार ठरू शकतात, त्यांनी कामातून स्वत:ला सिद्ध केले असून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षांना घेऊन पुढे जाऊ शकतात, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी हे विधान केले आहे.