पिंपरी-चिंचवड : मे महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने उष्णता वाढत चालली आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी उच्चांकी पारा नोंदवला जात असताना अंगाची लाहीलाही होत आहे. अशा रखरखत्या उन्हात भर दुपारी तेही डांबरी रस्त्याच्या बाजूला काही वेळ काढण्याचा आपण विचारही करु शकत नाही. पण आईमध्ये ईश्वर असतो, तिची सहनशीलता थक्क करणारी असते, ती तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते याची प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहे. मुलीला दमा असल्याने त्याचा खर्च भागत नाही, त्यात पोटापाण्याचा प्रश्न आहेच. यावर उपाय नसल्याने कुष्ठरोग असलेल्या आईला भर उन्हात रस्त्याच्या कडेला बसून भीक मागावी लागत आहे. शोभा विश्वनाथ कांबळे असे या माऊलीचे नाव आहे. कुष्ठरोगामुळे हाताची आणि पायाची बोट झडली आहेत. अशातच त्यांना करावा लागत असलेला संघर्ष अंगावर शहारा आणणारा आहे.

शोभा विश्वनाथ कांबळे या मूळ मुंबईच्या, परिस्थिती नसल्याने त्यांना ९ वीमध्येच शाळा सोडावी लागली. त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय होता. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या बळावर भाजीचा व्यवसायाही सुरु केला. दोन्ही व्यवसाच चांगले सुरु असताना त्यांचे लग्न झाले. शोभा यांना दोन मुली. या मुली १२ आणि १८ वर्षाच्या असताना शोभा यांना कुष्ठरोग झाला. त्यावर त्यांनी अनेक उपचारही घेतले. मात्र मी गेल्या जन्मी कुठलं तरी मोठं पाप केलं असेल म्हणून रोग झाल्याचं शोभा म्हणतात. पतीला दारूचं व्यसन असल्याने पतीचा मृत्यू झाला. घरात दोन तरुण मुली होत्या, त्यात कुष्ठरोग झाला. भावाला आणि बहिणीला शोभा यांच्यामुळे स्थळ येत नव्हतं. अशावेळी शोभा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी रेल्वे स्थानकात गेल्या असताना त्यांना एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी शोभा यांना मार्गर्शन केले. या व्यक्तीने शोभा यांना लातूर येथे उपचार घेण्यास सांगितले. तसेच लग्नासाठी एक चांगल स्थळही सुचवलं. त्यांनी दुसरा विवाह केला, पतीने दोन्ही मुलींचाही स्वीकार केला परंतु काही वर्षाने त्यांचा देखील अकस्मात मृत्यू झाला.

अनेक अडचणींवर मात करत त्यांनी धीराने मुलींच लग्न केलं. मात्र मुलगी सविता हिला दमा असल्याने जावायाने शोभा यांच्याकडेच सोडलं, मी माझ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करत असल्याने मला पत्नीच्या आजारपणाचा खर्च शक्य नाही असे जावयाने सांगितले. सविताच्या आजारपणावर खर्च शक्य नसल्याचे आई शोभा सकाळ पासून ते रात्री पर्यंत रखरखत्या उन्हात मंदिरासमोर भीक मागत आहेत. त्यांना दिवसाचे दोनशे ते तीनशे रुपये मिळतात यातून त्या सविताच्या आजारावर काही पैसे खर्च करतात तर उपजीविका भागवण्यासाठी उर्वरित रक्कम खर्च होते. मिळेल ते अन्न खातात,बरेच जण अन्नदान देखील करतात. सध्या त्या मुलीसोबत पिंपरी-चिंचवड मध्ये राहतात. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वतः करून खाणार आणि माझ्या मुलीला जपणार असल्याचं कणखर मत त्यांनी व्यक्त केलं आहे.