रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या समुद्रात होणारी एलईडी मासेमारी तत्काळ बंद करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पदुम अनुपकुमार यांनी दिले असून अशा स्वरुपाची नियमबा मासेमारी करणाऱ्यांचे परवाने कायमस्वरुपी निलंबित होतील, असा इशाराही दिला आहे. काही मोठय़ा यांत्रिक नौकांकडून रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाश असलेले एलइडी दिव्यांचा वापर करून अवैध पध्दतीने मासेमारी केली जाते, अशा तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. पण या प्रकारांना फारसा पायबंद बसलेला नाही. त्यामुळे संतप्त पारंपरिक मच्छिमारांनी मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर येथील अल्पबचत सभागृहात मासेमारी करणाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. यावेळी अनुपकुमार म्हणाले की, मासेमारीबाबत असलेला कायदा बदलण्याची गरज आज निर्माण झाली असून याबाबत केंद्रीयस्तरावर अभ्यास झालेला आहे. त्यातील चांगल्या बाबींचा समावेश करुन सर्वंकष धोरण निर्मिती व नवा कायदा निर्मितीसाठी आपण आग्रही राहू. परंतु त्यासाठी एलईडी मासेमारी तत्काळ बंद करणे आवश्यक आहे. एलईडी मासेमारी बंद व्हावी. याबाबतचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत तथापि मासेमारी करणाऱ्यांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे, असेही अनुपकुमार यांनी नमूद केले. मासेमारी करणाऱ्यांसमवेत शासन कायम उभे राहिले आहे. मात्र मी कुणालाही कायदा हाती घेऊ देणार नाही. आपले मुद्दे विकासाशी निगडीत आहेत त्याचा जरुर विचार होईल मात्र शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करुन आपण मासेमारी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याप्रसंगी केले. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय उपसचिव श्रीनिवास शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव इत्यादी अधिकारी बठकीला उपस्थित होते.