उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे आज (गुरूवार) दुपारी शेतात काम करत असताना वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार झाल्या. तर सोबतच्या अन्य तीन महिला जखमी झाल्या.

वाणेवाडी येथील शालुबाई बबन पवार (वय ५०), शीतल तुळशीराम घुटुकडे (वय ३२) यांच्यासह श्यामल लहु सरवदे (वय ४०), कौशल्या शेषेराव सरवदे (वय ४५) व छाया भास्कर सरवदे (वय ५०) या महिला वाणेवाडी शिवारातील शेतीत मशागतीचे काम करीत होत्या. दरम्यान, दुपारी वाऱ्यासह आभाळ भरुन आले. दीड वाजण्याच्या सुमारास महिला काम करीत असलेल्या ठिकाणी अचानक वीज कोसळली. या घटनेत शालुबाई पवार व शीतल घुटुकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघी जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत शालुबाई यांच्या मागे एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. तर शीतल घुटुकडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.