कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत  १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.

लॉकडाउनबद्दल विचारलं असता त्यांनी सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तसंच दोन दिवसांत याबद्दलची नियमावलीही जाहीर होईल असंही ते यावेळी म्हणाले.