विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पवारसाहेबांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळवण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेली अनेक वर्षे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याच्या मंत्रीपदावर त्यांनी काम केले आहे. उपमुख्यमंत्रीपदही भूषविले होते. शिवाय खासदारही होते. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहितेपाटील हेही खासदार होते. आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं परंतु त्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो. आजही राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज पक्ष सोडला. त्यांच्याविषयी वेगळं आणि वाईट बोलणं योग्य नाही असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले. माढा मतदारसंघात आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, आम्ही सक्षम उमेदवार देवू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला. निवडणूका येतात त्यावेळी अनेक प्रश्न असतात. सत्ता असली त्याजवळ जाणारे असतातच. कच्चे दुवे सत्ताधारी साधत असतात असे सांगतानाच माढातील ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मांडली. नीरव मोदी पकडला आणि जामीनावर सुटलाही असे सांगतानाच नीरव मोदी लंडनमध्ये आहे हे सगळ्यांना माहित होते. त्याला आणण्याचे नाटक करत आहेत. मोदींची किंवा सरकारची या देशातून पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची मानसिकता नाही असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा देशातून पराभव का व्हावा हे राज ठाकरे यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे असेही जयंतराव पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. २३ मार्चला आघाडीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. रितसर जागा कोणाला असतील हे जाहीर केले जाईल असेही जयंतराव पाटील म्हणाले. राहुल गांधी यांचा विजय आहे. राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' ही मोहीम राबवली. यातून बाहेर पडण्यासाठी मोदी यांनी चौकीदाराला महत्त्व दिले आहे असा टोला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी लगावला.