अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडीतील घटना

नजरचुकीने चालू राहिलेला हीटर उलटून त्यातील उकळते पाणी जवळ झोपलेल्या तीन मुली व एका महिलेच्या अंगावर पडले. यात त्या गंभीर भाजल्या. उपचारादरम्यान तीन मुलींचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. सुट्टय़ांनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींचा मृतात समावेश असून, या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे ही घटना घडली.

दुर्गा बिभीषण घुगे (वय १०, रा. सोनपेठ) धनश्री पटू केदार (वय ८, रा. व्हट्टी, ता. रेणापूर) आणि अदिती संभुदेव भताने (वय ४) अशी मृत बालिकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघी जणी उन्हाळय़ाच्या सुट्टीनिमित्त भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. रात्री दुर्गा, धनश्री, अदिती आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता (वय २४) या घरात झोपल्या होत्या, तर इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसांपासून वीज नसल्याने सकाळी सुरू केलेल्या पाण्याच्या हीटरचे बटण तसेच चालू अवस्थेत राहिले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हीटर सुरू झाला. त्यातील पाणी उकळून बाहेर आले आणि जवळच गाढ झोपेत असणाऱ्या तीन मुली आणि संगीता भताने यांच्या अंगावर पडले. या घटनेत चौघीही गंभीर भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान अदितीचा मृत्यू झाला तर प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे उपचार सुरूअसताना १२ जून रोजी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी अदिती, दुर्गा आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.