महाराष्ट्राने आताच तर्कवादाची कास धरली नाही तर १०० वर्षांनी महाराष्ट्रातील बुद्धिवंत आपल्याला युरोप-अमेरिकेत शोधावे लागतील, असा सावधगिरीचा इशारा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यात ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर कुबेर बोलत होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत धर्म-जातीचा राजकारणावरील पगडा वाढला आणि तेथून महाराष्ट्राने तर्कवादाची कास सोडली व बौद्धिक पीछेहाट सुरू झाली. महाराष्ट्राने तर्कवादाच्या आधारे देशाचे वैचारिक नेतृत्व केले असल्याने तर्कवादाच्या पुनरुत्थानातच महाराष्ट्राचे व देशाचे हित आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. आध्यात्मिक अशा संत साहित्यातही तर्क वादाच्या आधारे समाजाला मार्ग दाखवणाऱ्या संत तुकाराम-संत रामदासांपासून ते इंग्रजी अमलाखालील महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणारे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गोपाळ कृष्ण गोखले, रखमाबाई राऊत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विज्ञानवादी सावरकर ते नरहर कु रुंदकर अशा बुद्धिवंतांच्या योगदानाची माहिती देत कुबेर यांनी महाराष्ट्रातील बुद्धिवादाच्या-तर्कवादाच्या परंपरेचा पट उभा के ला. ‘भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धिच्या देशा’ असे गोविंदाग्रज यांनी १०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या गीतामध्ये म्हटले होते याची आठवण करून देत आपण भावभक्तीत अडकलो व बुद्धिवादाला दूर ठेवले, अशी खंत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली. प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी पॉवर्ड बाय : मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, पुणे