राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असून मुंबईकडे जितकं लक्ष दिलं जात आहे तेवढं लक्ष पुण्याकडे देताना दिसून येत नसल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि  विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना व्यक्त केलेलं हे मत योग्य आहे का यासंदर्भात ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने जनतम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसत्ताच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर जनमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये पाच हजार ८७० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी फेसबुकवरील तीन हजार ६०० वाचकांपैकी ६७ टक्के वाचकांनी मुंबई पुण्यात भेदभाव केला जात असल्याचा फडणवीस यांचा आरोप योग्य वाटत नसल्याचे मत नोंदवले. मात्र ट्विटरवर याच्या उलट चित्र दिसून आलं. ट्विटरवर मत नोंदवणाऱ्या दोन हजार २७० जणांपैकी ७४.८ टक्के वाचकांनी होय असं मत नोंदवत फडणवीस यांनी केलेला मुंबई- पुणे भेदभावासंदर्भातील मात योग्य वाटत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

सोमवारी (२७ जुलै रोजी) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना फडणवीस यांनी, “हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाइन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही. वेळेत व्यवस्था निर्माण केली तर लोकांनी खूप अडचणींचा सामना करावा लागेल,” असं मत व्यक्त केलं.

जनतेचं म्हणणं काय?

याच मुद्द्यावरुन जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने केला. #LoksattaPoll अंतर्गत ‘करोना संकटात ठाकरे सरकार पुण्याच्या तुलनेत मुंबईला झुकतं माप देतंय हा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप पटतो का?’ हा प्रश्न फेसबुकवर तसेच ट्विटरवर विचारण्यात आला. या प्रश्नाला फेसबुकवर तीन हजार ६०० तर ट्विटरवर दोन हजार २७० वाचकांनी प्रतिसाद देत आपले मत नोंदवले. मात्र दोन्हीकडील मतांमध्ये टोकाचा फरक दिसून आला.

फेसबुकवरील वाचक काय म्हणतात?

फेसबुकवर मत नोंदवणाऱ्या तीन हजार ६०० पैकी ६७ टक्के वाचकांनी म्हणजेच दोन हजार ४०० वाचकांनी ‘करोना संकटात ठाकरे सरकार पुण्याच्या तुलनेत मुंबईला झुकतं माप देतंय हा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप पटत नाही’ असं मत नोंदवलं. तर उरलेल्या एक हजार १०० जणांनी म्हणजेच एकूण मत नोंदवणाऱ्यांपैकी ३३ टक्के वाचकांनी होय फडणवीस यांनी केलेला मुंबई पुणे भेदभावाचा आरोप योग्य वाटत असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवरील जनमत मात्र फडणवीसांच्या मताशी सहमत…

ट्विटरवर या जनमत चाचणीमध्ये दोन हजार २७० जणांनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ७४.८ टक्के वाचकांनी होय फडणवीस यांनी केलेला मुंबई पुणे भेदभाव होण्यासंदर्भातील आरोप योग्य वाटतो या बाजूने कौल दिला आहे. फडणवीसांच्या मताशी असहमती दर्शवणाऱ्यांचे प्रमाण २५.२ टक्के इतके आहे. म्हणजेच दोन हजार २७० वाचकांपैकी एक हजार ६९८ वाचकांनी फडणवीस यांचा आरोप पटत असल्याच्या बाजूने मत नोंदवले आहे. तर ५७२ जणांनी नाहीच्या बाजूने मत नोंदवत मुंबई पुण्यामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप पटत नसल्याचे म्हटले आहे.

एकंदरितच हे जनमत पाहिल्यास वेगवेगळ्या माध्यमांवर मुंबई पुण्याबद्दल फडणवीस यांनी केलेल्या मतभेदासंदर्भातील वक्तव्यावरुन वाचकांमध्येच टोकाची मते असल्याचे दिसून येत आहे.