गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा, ढोल-ताशे व बेन्जोच्या निनादात आबालवृद्धांच्या अमाप उत्साहात सात दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. या वेळी पंचगगा नदीघाट, कोटीतीर्थ तलाव, रंकाळा तलाव परिसर विसर्जनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यंदा मूर्ती व निर्माल्य दान करण्यास विशेष प्रतिसाद मिळाल्याचे ठळकपणे दिसून आले. सायंकाळपर्यंत विसर्जनासाठी आणलेल्या मूर्ती सहा ट्रॉलीमधून पंचगंगा नदी घाटापासून नेण्यात आल्या. घरगुती गणपतीसह सहकारी संस्था, बँका यांनीही लाडक्या गणरायाला निरोप दिला. गेल्या सात दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. आज सातव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले. पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. यंदा पंचगंगा नदीचे पात्रातील पाणी खूपच कमी झाले होते. यामुळे पुरातन मंदिरे प्रदीर्घ कालावधीनंतर नजरेस आली. तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला होता. त्याचे भान आज विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी ठेवले. अनेक भक्तांनी श्री मूर्ती काहिलीत ठेवलेल्या पाण्यात विसर्जति करून नंतर ती दान केली. या कामाकरिता महापालिका, जीवनमुक्ती, रोटरी क्लब, इनरव्हिल क्बल, अंनिस आदी संघटनांचे कार्यकत्रे मदत करताना दिसत होते. गौरीपूजनासाठी आणलेले निर्माल्यही नदीत न टाकता कुंडामध्ये जाणीवपूर्वक टाकले जात होते. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. सकाळच्या सुमारास पावसाने आगमन केल्याने भक्तगणांमध्ये थोडीशी नाराजी पसरली होती. मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तरुण मंडळाचे कार्यकत्रे होडी व यांत्रिक बोटीतून लक्ष ठेवून होते. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस लक्ष ठेवून होते.इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. दरम्यान, रोटरी क्लब सेंट्रल, मारवाडी युवा मंच, मनोरंजन मंडळ आणि नगरपालिका यांच्या वतीने गांधी पुतळा येथे निर्माल्य कुंड व श्री मूर्ती विसर्जनासाठी काहिली ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर पालिकेने नदीघाटावरही मोठी काहिली ठेवून त्यामध्ये विसर्जन करून मूर्तीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांतूनही प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला. पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले. घाटावर पालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तनात ठेवले होते. दिवसभर नदीवेस नाका ते नदीघाट हा रस्ता गर्दीने अक्षरश: फुलला होता. रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून येत होती.