फटाके विक्री आणि आतषबाजी घटल्यामुळे यंदा दरवर्षी दिवाळीत होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातांचे प्रमाण ९० टक्क्य़ांनी घटले आहे.दिवाळीत अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे आणि लक्ष्मीपूजनावेळी रात्री फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असते. याच दरम्यान, आकाशात उडणारी पाखरे पहाटे घरटय़ाच्या बाहेर पडण्याच्या आणि घरटयाकडे जाण्याच्या तयारीत असतात. आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांचा धक्का लागून गेल्यावर्षी ४८ पाखरांना फटका बसला होता. यापैकी ३० पक्षी मृत झाले तर १८ पक्षी जखमी झाले होते. यंदा एकूण फटाक्याचे प्रमाणच कमी झाल्याने सांगली शहरात केवळ ७ पक्ष्यांना फटाक्यांचा मार बसला असून यापैकी दोन चिमण्या मृत्युमुखी पडल्या. तर जखमीमध्ये २ चिमण्या, एक कावळा, २ साळुंकी आणि १ बुलबुल असे पाच पक्षी आहेत. या जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत असल्याचे इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले. दरवर्षी या कालावधीत फटाक्याने घायाळ होणाऱ्या पक्ष्यांना औषधोपचार करण्यासाठी इन्साफ फाउंडेशनचे कार्यकत्रे शहरातील रस्तोरस्ती फिरत असतात. कुणाचा फोन आला की तत्काळ घटनास्थळी जाउन जखमी पाखराला ताब्यात घेउन त्याच्यावर औषधोपचार करण्यात येतात. प्रसंगी काही काळ सोबत ठेवून उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना सोडण्यात येते. गेल्या वर्षी फटाक्यामुळे इजा झालेल्या पाखरांची संख्या ४८ वर पोहचली होती. यंदा फटाक्याचे प्रमाण विशेषत आकाशात उडणारे रॉकेट, बाण यासारखे फटाके कमी प्रमाणात उडाल्याने जखमी होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.