कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याची दुर्दैवी घटना गेल्या आठवड्यात घडली. यामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या देखील घटना घडल्या. कोल्हापुरात देखील पावसानं थैमान घातल्यानंतर या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. २०१९मध्ये देखील कोल्हापुरात अशाच प्रकारे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. यामध्ये पुलाच्या मोऱ्यांचा आकार, मोठ्या प्रमाणावर झालेलं अतिक्रमण आणि अलमट्टी धरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाला!

अनेक भागांमध्ये एकाच दिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं अजित पवार यावेळी म्हणले. “या वेळी कोल्हापुरात खूप पाऊस पडला. काही ठिकाणी एकाच दिवसात ३२ इंच पाऊस पडला. काही भागांमध्ये दोन दिवसांत ४९ इंच पाऊस पडला. अलमट्टी धरणाचा मुद्दा बऱ्याचदा येतो. वारणा, पंचगंगेचं पाणी आल्यामुळे फुगवटा वाढतो. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे तिथलं दूध राज्याच्या इतर भागात पाठवता आलं नाही. काल पाणी कमी झालं आणि आता वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली

Ajit Pawar in Kolhapur flood
कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज भेट दिली. यावेळी जयंत पाटील देखील त्यांच्यासोबत होते.

ब्रिटिशकालीन मोऱ्या बदलणार!

कोल्हापुरात अनेक ठिकाणी कमी आकाराच्या मोऱ्या असल्याचा मुद्दा यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. “सध्याच्या मोऱ्या ब्रिटिशकालीन आहेत. त्याचा आकार कमी आहे. आता कमी वेळात जास्त पाऊस पडतो. बऱ्याचदा गाळ, दगड किंवा झाडं वाहून आल्यामुळे या मोऱ्या बंद होतात. त्यामुळे आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील. पावसाळा संपला की बॉक्स किंवा स्लॅब प्रकारचे पूल बांधले जातील”, असं ते म्हणाले.

“अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा”, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला!

अतिक्रमणांवर कारवाई होणार?

दरम्यान, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी जाहीर केलं. “बरेच जण म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट आलं आहे. काही भागात आजही पाऊस नाही, पण काही भागांत खूप पाऊस पडला. काही ठिकाणी ४ दिवसांत ४०० मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. काहींच्या मते अतिक्रमित बांधकामांमुळे हे झालं. त्यामुळे अतिक्रमण देखील हटवण्याचं पाऊल उचललं जाणार आहे. यात चालढकल करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असं त्यांनी सांगितलं.

सांगलीत पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम; प्रशासनाचा अंदाज चुकल्याने नागरिकांची धावपळ

अलमट्टी धरणाच्या विसर्गाचं काय?

२०१९मध्ये कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यंदाही कोल्हापूरच्या पुरानंतर अलमट्टी धरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे हे होतंय का, याविषयी अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीने तसं होत नसल्याचा निर्वाळा दिल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “अलमट्टी धरणाविषयी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करत आहेत. दोन्ही राज्यांकडून समन्वयाने उपाय योजन्यासाठी पावलं उचलली जात आहेत. आम्ही समिती नेमली होती की खरंच अलमट्टीमुळेच या घटना घडतात का? याविषयी तज्ज्ञ समितीने अहवाल दिला होता. त्यात असं काही होत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता”, असं अजित पवार म्हणाले आहेत.