मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि नागपुरात टायर जाळण्यात आले असून बारामतीत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुण्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर या तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत. दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.