मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून कोणतेही गालबोट न लावता बंद यशस्वी करुया, असे आवाहन मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. या समाजाच्या मागण्या काय आहेत आणि त्यांचे नेमके म्हणणे काय याचा घेतलेला आढावा. > मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर सरकार गंभीर नसून चार वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. > ढासळत्या कृषी अर्थव्यवस्थेत होणारी घुसमट ओळखून त्यावर उपाययोजना कराव्यात. > तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे मराठा युवकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढावा. > शिक्षण, रोजगार निर्मितीसाठी शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के सवलतीचा आदेश सरकारने काढला. पण महाविद्यालये हा आदेश मानत नसून यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृह उभारण्याच्या दिशेनेही पावले उचलण्यात आलेली नाही. > अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करुन वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. मराठा युवक- युवतींना यापासून वंचित ठेवून सरकार काय साधू इच्छिते?. > शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यामुद्द्यांवर सरकार अपयशी ठरली आहे. > महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार उदासिन > अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे. > मराठा समाजाला आता आश्वासने नको असून सरकारने तातडीने मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा. > मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे. > राज्य मागासवर्गीय आयोगाचे कामकाज जलदगतीने पूर्ण करावे. > मराठा आरक्षणासाठी २९ युवकांनी बलिदान दिले असून त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरी द्यावी.