मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नसून हा बंद शांततेच्या मार्गाने पार पडेल, असे आश्वासन मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर महामोर्चाच्या वतीने आंदोलकांसाठी आचारसंहिता देखील जारी करण्यात आली आहे. कोणतेही गालबोट न लावता बंद यशस्वी करुया, असे आवाहनही मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. काय म्हटले यात हे जाणून घेऊया. १. बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे. २. बंदमध्ये कोणत्याही शासकीय किंवा खासगी मामलत्तेची तोडफोड किंवा जाळपोळ करु नये. ३. प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपले विभाग बंद करायचे आहे. ४. बंद सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत असेल. ५. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही आपली जबाबदारी आहे. ६. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. ७. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. ८. सोशल मीडियावरील बातम्यांची खातरजमा करावी. ९. अफवांवर विश्वास ठेवू नये. १०. मराठा आंदोलकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे. आपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करु नये. ११. आत्महत्या करुन हा प्रश्न सुटणार नाही. समाजातील तरुणांनी आत्महत्या करु नये.