सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधला. ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटचं निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर मातांच्या आक्रोशानं अंधार हेलावून गेला. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणाऱ्या मातांना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले. शनिवारची सकाळ महाराष्ट्राला ह्रदयाला पाझर फोडणारी बातमी घेऊन आली. भंडारातील जिल्हा रुग्णालयात झोपेच्या डुलक्या घेणाऱ्या कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांना काळानं हिरावून घेतलं. सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं गुदमरुन मृत्यू झाला. तर तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. कोमळ हळव्या शरीराचे झालेले ऐकून चिमुकल्यांच्या मातांचं अवसानच गळालं. क्षणभर काहीच कळालं नाही. लेकरू कायमच गेलं, हे ध्यानात येताच रुग्णालयाला हेलावून टाकणारा आक्रोश मातांच्या मुखातून बाहेर पडला. चिल्यापिल्यांसाठीचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नाही. तर रुग्णालयाच्या भिंतीही शहारल्या. प्रशासन सात मुलांना वाचवल्याचं सांगत असलं, तरी दहा कुटुंब मात्र शोकात बुडाली आहे. The fire that broke out at around 2 AM claimed lives of 10 children. But we have been able to save lives of 7 children. Technical committee will investigate to ascertain the reason behind the fire: Sandip Kadam, District Collector, Bhandara. #Maharashtra pic.twitter.com/ecKgS7U5zg — ANI (@ANI) January 9, 2021 रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सरकारकडून नुकसान भरपाई देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं, ते या पैशातून मिळणार आहे का? असा सवाल दुःखाच्या सागरात बुडालेली ही कुटुंब करत आहेत.