शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम हाती घेतली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर, सरकार पाडण्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी ईडीला हाताशी घेऊन अशाप्रकारे दबाव आणत आहेत अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बहुतांश मंत्र्यांनी मांडली. संजय राऊत यांनी तर, महाराष्ट्रात आमचं सरकार आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली.

आमच्यावर सूड उगवलात तर आम्ही १० सूड काढू असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचं सांगत त्यावर आपलं मत काय असा प्रश्न प्रविण दरेकर यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्याबद्दल दरेकर यांना उत्तर दिलं. “राजकारणात प्रत्येक जण हा लढणारा कार्यकर्ता असतो. प्रत्येक जण सुडाचा बदला सुडाने घेऊ शकतो. पण सुडाला सुडाने उत्तर देऊ असं म्हणण्यापेक्षा सुडाला वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता आहे. एखादी कारवाई झाली असेल तर त्यावर चर्चा (डिबेट) केली जाऊ शकते. पण संविधान दिवसाच्या वेळीच अशाप्रकारे वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांनी लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

आणखी वाचा- वाढीव वीजबिलावरुन राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन, म्हणाले…

“महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अंतर्गत विसंवाद मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार पाडण्याच्या प्रश्नावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पण या सरकारलाच सत्ता जाण्याची भीती वाटते आहे. अंतर्गत विसंवादाने सरकार कोसळण्याची भीती त्यांना वाटते आहे. राज्यातील जनतेच्या मनात असलेला आक्रोश त्यांना जाणवला आहे. त्यामुळे भीतीपोटी मविआचे नेते भाजपावर आरोप करत आहेत”, असेही दरेकर म्हणाले.