उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहनाच्या मालकाचा मृतदेह आढल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास एटीएसकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही”.

मोहन डेलकर प्रकरणाचा तपास करणार-
“त्याचप्रमाणे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने सिलवासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. हा विषय पण गंभीर आहे पण कदाचित याविषयी बोलण्यासाठी विरोधी पक्षाला तोंड नाही. केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अख्त्यारित येतो हे तुम्हाला माहित आहे. सात वेळा निवडून आलेल्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या करावी हे तिथल्या प्रशासनाला लांछनास्पद आहे. सुसाईट नोट सापडली असून काही उल्लेख आहेत. उल्लेख आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि कितीही मोठा असला तरी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपाला वाजपेयींच्या वक्तव्याची आठवण करुन देत सांगितलं की, “सरकार येतं आणि जातं पण मूळ यंत्रणा बदनाम करता कामा नये. सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. महाराष्ट्रात काही व्यवस्थाच नाही आणि सगळं काही केंद्राच्या अख्त्यारित आहे असं दाखवत आहेत. तसं असेल तर इंधन दरवाढीचा मुद्दाही त्यांच्या पदरात टाका”.

“महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते त्यांचा सरकारवर विश्वास नाही. पण दुर्दैवाने मोहन डेलकर यांनी येथील सरकार योग्य ती चौकशी करेल आणि आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांना शासन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही निवेदन दिलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली