मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शुक्रवारी संध्याकाळी तब्बल दीडतास चर्चा झाली. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिली आहे.

राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना एसीबीकडून क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रिपद शिवसेना, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाला तेव्हा अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती. आता सिंचन घोटळयात क्लीनचीट मिळाल्यामुळे अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा महाविकास आघाडीच्या आमदारांचा आग्रह आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले असले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणाकुणाला मंत्री करायचे याचा अद्याप घोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली.

या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यसह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई छगन भुजबळ व नितीन राऊत या सहा मंत्र्यांचा २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे. लवकरच अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होईल असे सांगितले जात होते. परंतु आठदिवसांत फक्त मुख्यमंत्री व सहा मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे व मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. परंतु खाते वाटप अजून रखडलेले आहे. काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठा गर्दी आहे. १२ मंत्रिपदांचे वाटप करताना प्रादेशिक व सामाजिक समतोल साधावा लागणार आहे.