बुलढाणा जिल्ह्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर भरधाव कंटेनरने बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सुदैवाने पुलाच्या कडेला दगड होते आणि यातील एका दगडामुळे बस थांबली. यामुळे बस खाली कोसळली नाही आणि ५५ प्रवाशांचा जीव वाचला. सर्व प्रवाशांची बसमधून सुखरुप सुटका झाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून नांदुरामार्गे बुलढाण्याकडे जात होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कंटेनर बसला धडक देऊन पुलावरून नदी पात्रात कोसळला. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कंटेनर नदी पात्रातील गाळात फसला असून, त्यात आणखी काही जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात बस कठड्यावरील दगडात अडकली. बसचा मागील भाग पुलावरून खाली अधांतरी लोंबकळलेल्या अवस्थेत होता. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. बसमध्ये एकूण ५५ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आल्यावर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत बस पुलावरून काढण्याचे काम सुरु केले. या अपघातामुळे पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतुक खोळंबली होती. पाच वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-पातुर्डा मार्गावर खिरोडा पुलावरुन एसटी बस पूर्णा नदी पात्रात कोसळून १९ जणांना जलसमाधी मिळाली होती. पूर्णा नदीवर २६ सप्टेंबर २०१२ रोजी घडलेल्या दुर्घटनेची आठवण या घटनेमुळे ताजी झाली.