एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लसीकरणावरून राजकीय वाद सुरू झालेला असताना राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला आहे. त्यासोबतच वाढते करोनाबाधित ही देखील आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब ठरली आहे!

 

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख १ हजार ५५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्याचा मृत्यू दर १.७९ टक्के इतका असल्याची नोंद झाली आहे.

 

मुंबईत १० हजार ४२८ नवे रुग्ण सापडले!

दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात १० हजार ४२८ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यासोबतच ६ हजार ७ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ८५१ इतका झाला आहे. तर एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६० इतकी झाली आहे.

पुण्यात दिवसभरात ४१ मृत्यूंची नोंद


पुणे
शहरात दिवसभरात ५ हजार ६५१ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर करोनाबाधितांची ३ लाख ५ हजार ५७२ इतकी संख्या झाली आहे. याच दरम्यान पुण्यात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ५ हजार ५६७ झाली आहे. त्याच दरम्यान ४ हजार ३६१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ५३ हजार ७३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.