देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख १९ हजार ४५७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मागच्या २४ तासात ९ हजार ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ लाख ७२ हजार ७८१ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार ६८३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबई, ठाणए, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरमध्येही करोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.

सांगली : एका व्हेंटिलेटरवर सुरू होत कोविड हॉस्पिटल, ८६ रुग्णांचा मृत्यू; डॉक्टरला अटक

मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ८८ हजार ९९० जणांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत १४ हजार ८०९ करोना रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर पोहोचला आहे. १३ जून ते १९ जूनपर्यंत करोना वाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता. ठाण्यात १३,८८१ रुग्ण, पालघरमध्ये १,६०४ रुग्ण, पुण्यात १८, ०७५ रुग्ण, नाशिकमध्ये ४,६३६, नागपूरमध्ये ४,३५३, औरंगाबादमध्ये २,०५० करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.