करोना पाठोपाठ राज्यावर लॉकडाउनचं ढग गडद होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि करोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती; उदय सामंत यांची माहिती

न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे,” असं अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

“आताच करोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना करोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.