महाराष्ट्रात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात २ हजार ९४९ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वी पेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे २५ मृत्यू नाशिक-११, अमरावती-६, पुणे-३, परभणी-२, नांदेड-२, नागपूर-१ असे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.