राज्यात आज दिवसभरात २१ हजार २९ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यासोबत राज्यभरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (२०.६९ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ७५ हजार ४२४ लोक होम क्वारंटाईन आहेत, तर ३४ हजार ४५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४७९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.