राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून पुन्हा एकदा औरंगाबादचं नामकरण करत संभाजीगर व्हावं अशी मागणी होत आहे. शिवेसना गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी करत असून दुसरीकडे काँग्रेसने मात्र याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असं सांगितलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भूमिका मांडली आहे.
“महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आलं. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत”.
आणखी वाचा- “…पुन्हा ठणकावून सांगतो,” बाळासाहेब थोरातांनी दिला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार?
“राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांना चर्चा करुन निर्णय घेतली. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.
मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल”.
आणखी वाचा- काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं?, संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी
जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी आहे. पण दर आठवड्याला पैसे येऊ लागले आहेत अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. अतिवृष्टीग्रस्त आणि अवकाळी पावसांचा फटका बसलेल्यांसाठी केंद्राकडून दिली जाणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचंही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 1:18 pm