राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणं चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

“करोनावर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची रविवारी बैठक होणार आहे. करोनाला कसं रोखता येईल याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात पॉझिटिव्हची संख्या जे डिस्चार्ज व्हायचे त्यांच्यापेक्षा कमी होती. पण १ फेब्रुवारीपासून काही शहरं, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत असून ते धोक्याचं आणि काळजीचं आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

“काल आमची कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आम्ही १ मार्चपासून अर्थसंकल्प अधिवेशचा कार्यक्रम आखला आहे. साधारण तीन चार आठवड्याचा कार्यक्रम दिला. पण त्याबद्दल पुन्हा गुरुवारी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आणखी वाचा- “….कमतरता खपवून घेतली जाणार नाही”; किल्ले शिवनेरीवर अजित पवारांचा इशारा

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “काही बाबतीच तेथील प्रशासनाला गरज वाटत असेल तर लॉकडाउन करा अशी मुभा दिली आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असं करायचं असेल तर तसं करा…पण बाकीच्या टीमला कोणी मास्क वापरत नसेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं आहे. प्रशासनाने लोकांना पुन्हा एकदा याबद्दलचं गांभीर्य लक्षात आणून दिलं पाहिजे”.

“माझी मीडियालाही विनंती आहे. गेल्यावेळी लाठीचार्ज झाला तेव्हा वेगळ्या पद्धतीने बोललं गेलं. पण त्याच्यातून लोकांना नियम पाळले पाहिजे असं समजलं होतं. पोलिसांनी तर करोना काळात स्वत:ला झोकूनच दिलं होतं. डॉक्टर, नर्सेस यांनीदेखील अनेकांचे जीव वाचवले,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात जमावबंदी‍!

वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “आत्ताच मी सौरभराव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून आपल्याला तातडीने बैठक घ्यावी लागेल असं सांगितलं. रविवारचा दिवस असला तरी सकाळी १० पासून आम्ही डॉक्टर साळुंखे, इतर अधिकारी त्यांच्याशी बोलून जे निर्णय घ्यावे लागतील त्यासंबंधी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ”.

रायगडावरील रोषणाईवर प्रतिक्रिया
“कधीकधी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या जयंतीवेळी काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. अजानतेने किंवा उत्साहाने अशा गोष्टी होत असतात. हे थांबलं गेलं पाहिजे, पावित्र्य राखलं पाहिजे. ही बाब गंभीर आहे, पुन्हा असं होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.