राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून तिथे लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

“आपल्याकडून डॉक्टर साळुंखे यांना आम्ही आढावा घेण्यासाटी पाठवलं होतं. त्यांनी सकाळीच मला सांगितलं, आपण येथील चौकात असून कोणीही मास्क वापरत नाही. संख्या झपाट्याने वाढत असताना कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याची चर्चा झाल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोललो. १२.३० वाजता बैठक होणार असून शहरापुरता लॉकडाउन ठेवायचा की संपूर्ण जिल्ह्याला लागू करायचा याबद्दल अंतिम निर्णय होईल,” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

“लग्नकार्य महत्वाचं आहे की करोनामध्ये माणसांना वाचवणं महत्वाचं आहे? नवरा, मुलगा आणि काही ठराविक लोक अशी लग्न झाली ना…परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हे रोखायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, सॅनिटायझर, स्वच्छता या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याकडे जानेवारी अखेपर्यंत रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या जास्त होती. पण १ फेब्रुवारीपासून पॉझिटिव्हची संख्या वाढू लागली आहे. त्यातही अमरावती, नागपूर, वर्धा आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये दिसत आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

“मुंबईची एवढी लोकसंख्या असतानाही त्याच्या तुलनेत अमरावतीत करोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मी आधीच कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका असं सांगितलं होतं. सगळ्यांनी गांभीर्याने घ्या असं मुख्यमंत्रीदेखील सांगतात. करोना कमी झाला म्हणून आधीसारखं राहू लागल्याने परिस्थिती गंभीर झाल्याची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. करोना इतर ठिकाणी पसरू नये यासाठी जी खबरदारी घेणं गरजेचं आहे ती घेतली जाईल,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?
अजित पवारांना अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे”.

अजित पवार यांनी यावेळी वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. “संजय राठोड गायब आहेत कोणी सांगितलं? आजच माझं यशोमती ठाकूरं, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे त्यामुळे लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल हे मी त्यांच्या कानावर घातलं आहे. राज्याच्या प्रमुखांनी निर्णय घेतला तर त्यांना तो समजलाच पाहिजे. सहकारी असल्याने त्यांना विश्वासात घेणं, माहिती देणं महत्वाचं असतं,” असं अजित पवार म्हणाले आहेत.