राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेना मात्र वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं असून एकाप्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागेदेखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किवं त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या : “माझ्याकडेही भाजपा नेत्यांची महिलांसोबतची डझनभर प्रकरणं”

“संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव गेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही,” असंही ते म्हणाले आहेत.