मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं ट्विट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचं म्हटलं आहे. ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

“मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये. म्हणूनच याच्यामध्ये निश्चितच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं. काही लोक खासकरुन ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीकोनातून काहीही घडू शकतं. ते पडताळून पाहणं राज्याचं ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय,” असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे. ही तांत्रिक समिती असेल. एका आठवड्यात रिपोर्ट आल्यानंतर जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. कोणालाही सोडणार नाही”.

“केंद्र सरकारचं तांत्रिक पथक आपलं काम करत आहे. सरकार काही मदत करु शकतं का याबद्दल चाचपणी करत आहेत,” अशी माहिती नितीन राऊत यांनी यावेळी दिली. तांत्रिक ऑडिटही केलं जाणार असून समिती त्यासंबंधीही माहिती घेणार असल्याचं त्यांनी सागितलं आहे. ८ तासात होणारं काम आमच्या विभागाने तीन तासात केलं आमि मुंबईला पूर्वपदावर आणलं असं सांगत नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं.

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं.

महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. ऊर्जामंत्र्यांनी मात्र यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.