लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात. पण आपल्याकडे आता केंद्रीय कृषीमंत्री पद नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपणास पाच वर्षे सुटीवर पाठविले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. शनिवारी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रातील नव्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. परंतु, निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून त्यास राष्ट्रवादी विरोध करेल, असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.