”भाजपाने पक्ष फोडण्याचं जे काम केलं, त्या मार्गाने आम्हाला जायचं नाही. राज्य कोणत्याही परिस्थिती मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस सरकारने केले. त्याची महाराष्ट्राने त्यांना शिक्षा दिलेली आहे.”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

खातेवाटप करण्याचा सर्व अधिकार मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करत आहेत, तेच योग्यवेळी निर्णय घेतील, यात कोणतीही अडचण नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार तुम्हाला झालेला दिसेल असं देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलाताना सांगितलं आहे.

आमच्या पक्षात जर कुणाला यायचं असेल तर रीतसर त्यांच्याबाबत चर्चा केली जाईल. सरकार वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आम्ही पक्षांतर कुठेही करू देणार नाही. पण जर स्थानिक पातळीवर कुणाला आमच्या पक्षात यायचं असेल, तर त्याचं स्वागत करताना आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेवून पावलं टाकू. जे आम्हाला सोडून गेले त्यातील अनेकजण अस्वस्थ आहेत, संपर्कात आहेत. यशावकाश योग्य तो निर्णय आम्ही त्यांच्यासाठी घेणार आहोत, गडबडीत कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या भाजपाच्या काही आमदारांसह काही नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शिवाय, विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्यांची देखील घरवापसी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जेवढी भरती मोठी तेवढीच ओहटी मोठी, हा तर निसर्ग नियम असल्याचे सांगत, ओहटीला सुरूवात झाली असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने या चर्चा अधिकच रंगात आल्या आहेत. भाजपातील सक्षम नेतृत्वाला दुर्देवाने दूर लोटल्या गेले तसेच भाजपातील जुन्या मंडळींची अस्वस्थाता आम्हाला जाणवत असल्याचे देखील थोरात म्हणाले होते.