राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. पण काही दिवसांपूर्वी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून असून मला त्याचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल म्हणून आजच्या अभिभाषणात ते राज्यातील जनतेच्या हिताची, कल्याणाची भूमिका मांडणार आहेत की, संघाचा कार्यकर्ता म्हणून अजेंडा राबवणार ? याबाबत विरोधी पक्षांच्या मनात संशय असल्याने आम्ही त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला असे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे.आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत. pic.twitter.com/tfAzsiWjYN — Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 25, 2019 राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. प्रथेप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. पण विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला व अनुपस्थित राहिले. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादीने अभिभाषणावर बहिष्कार घातला. राज्यपालांनी विधिमंडळात प्रवेश करताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली. सहा दिवस हे अधिवेशन चालणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकरभरती, दुष्काळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.