प्रशांत देशमुख, लोकसत्ता वर्धा : शालेय विद्यार्थिनींना आरोग्य संवर्धनाची माहिती मिळावी म्हणून राज्य शासन पुरस्कृत २४ आणि २५ फ फेब्रुवारीला आयोजित ‘गो-गर्ल-गो’ या उपक्रमाचा प्रतिसादाअभावी पुरता फज्जा उडाला असून यावरून क्रीडा विभाग व शिक्षणखाते परस्परावर दोषारोपण करीत आहेत. यामुळे एका चांगल्या उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, स्पर्धाना प्रोत्साहन मिळावे व व्यायाम करावा व स्वास्थ्य राखावे या उद्देशाने केंद्र शासनाने ‘फि ट इंडिया मुव्हमेंट’ या उपक्रमाची सुरुवात २९ ऑगस्ट २०१९पासून केली. त्या अंतर्गत राज्य शासनाने ‘गो-गर्ल-गो’ या उपक्रमास प्रारंभ केला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ’ हे सूत्र ठेवून राज्य शासनाने मुलींच्या स्वास्थ्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सुरू केला. मुलींना अधिकाधिक क्रीडा सायी, मोकळे वातावरण व कौशल्य विकसित करण्याची संधी देण्याचा या उपक्रमाचा हेतू होता. यात सहा ते अठरा वयोगटातील मुलींना स्वच्छता, पोषण, योग्य सवयी व आरोग्याबाबत माहिती दिल्यास निकोप कुटुंबाचा पाया रचण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरले. तालुका पातळीवर २४ व २५ फे ब्रुवारीला हा उपक्रम झाला. सहा ते नऊ, दहा ते तेरा व चौदा ते अठरा अशा तीन गटातील मुलींसाठी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र जिल्हय़ातील आठही तालुक्यातून नाममात्र उपस्थिती दिसून आली. वध्रेत २४, आर्वी-१५, हिंगणघाट-४०, सेलू-१२ अशा विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्यात. तालुक्यातील शाळांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्हय़ातून तीनही गटातील चारशेवर मुलींचा सहभाग अपेक्षित होता. परंतु निम्मी उपस्थिती दिसून आली नाही. क्रीडा व शिक्षण खात्यातर्फे हा उपक्रम संयुक्तपणे घेण्याची जबाबदारी होती. परंतु दोन्ही खात्यात समन्वय नसल्याने व परस्परावर जबाबदारी ढकलण्यात आल्याने उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे मंगळवारच्या आयोजनावरून स्पष्ट झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती माने यांनी उपक्रमात सहभागी मुलींची संख्या सांगण्यास असमर्थता दर्शवली. आकडेवारी यायची आहे. आमच्याकडे शाळेमार्फत आलेल्या मुलींनाच सहभागी करून घेतले. शिक्षण खात्यावर त्याची जबाबदारी होती, असे स्पष्ट करीत माने यांनी उपस्थितीवर भाष्य करण्याचे टाळले. तर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी हा पूर्णपणे क्रीडा खात्याचा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले.