महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच Maha Jobs पोर्टल लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. एमआयडीसीकडे या पोर्टलची जबाबदारी असेल. स्थानिकांची भरती करण्यासाठी एमआयडीसीने ९५० व्यापार आणि १७ वेगेवगळी क्षेत्र निवडली आहेत. इंडस्ट्री युनिट आणि नोकरीची गरज असणारे दोघेही या पोर्टलवर नोंदणी करु शकतात. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

उद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर ६५ हजार इंडस्ट्रीयल युनिट्स सुरु झाले असून त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून नुकतंच एक मानव संसाधन सर्वेक्षण करण्यात आलं. जवळपास ३३०० युनिट्सकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्यांना जवळपास ५० हजार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७० टक्के कुशल तर ३० टक्के अकुशल आहेत”.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एमआयडीसीमध्ये स्थित असणाऱे इंडस्ट्रीयल युनिट तसंच बाहेर असणारेही या पोर्टलवर भरतीसाठी नोंदणी करु शकतात. १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, उत्पादन, लॉजिस्टिक, वस्त्रोद्योग, वस्त्र, प्रक्रिया, औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान यांचा समावेश आहे”.

“हे पोर्टल एक मंच उपलब्ध करुन देईल. कंपनी तसंच ज्यांना नोकरीची गरज आहे ते दोघंही नोंदणी करु शकतात. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल सर्वांसाठी ही संधी उपलब्ध आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.