नव्या वर्षाचे स्वागत करा, करोनाची नाही असं सांगत महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अशा दोन दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जाहीर केली आहे. २०२१ हे वर्ष सुरु होण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसंदर्भातल काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो घरीच रहावे. दिवसा संचारबंदी नसली तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी शक्यतो बाहेर पडू नये. घरीच साधेपणाने नव वर्षाचे स्वागत करावे

३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यांवर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क आणि सॅनेटायझर्सचा वापर करणं अनिवार्य

मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये गर्दी न करता आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

६० वर्षांच्या वरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे

फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन करावे

अशा सगळ्या सूचना जारी करत महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नियमावली घालून दिली आहे.