राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.

कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं.

आणखी वाचा- राणेंना शिवसेनेचे दे धक्का; तीन पैकी दोन जागी भगवा

सिंधुदुर्गातही शिवसेना भाजपापेक्षा सरस

भाजपा आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत.  कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झालीय. कणकवली हा आमदार नितेश राणेंचा गड मानला जातो त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कणकवलीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेलं राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात.

आणखी वाचा- Gram Panchayat Results : हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार विजयी

किती टक्के मतदान झालं?

ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के  मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये होईल. एकू ण १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात २६,१७८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकू ण ४६,९२१ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

जिल्हानिहाय संख्या

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :  ठाणे -१४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक -५६५, धुळे -१८२, जळगाव -६८७, नंदुरबार- ६४, नगर -७०५, पुणे -६४९, सोलापूर- ५९३, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलढाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०